Monday, May 11, 2020

How to Draw a Dog !

Easy & Simple Drawing of Cute Dog by Milind Dombale for Kids


YouTube Link - https://youtu.be/IxY0paSqpCQ

Saturday, May 9, 2020

Wednesday, June 6, 2018

श्री मायाप्पा (मायाबा) आरती

हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मायाप्पा (मायाबा) रायाची आरती...

# गीत : मिलिंद डोंबाळे
# स्वर : संतोष माहेश्वरी
# संगीत : उमेश गवळी व बापू ननावरे
# ध्वनीमुद्रण : सुधीर नेमाने (कार्तिक स्टुडिओ, साखरवाडी)
# YouTube लिंक : https://goo.gl/BjfyVT


Saturday, September 23, 2017

मराठी कविता - धनगरी बाणा

सद्य परिस्थितीत महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या न्यायीक मागण्यांच्या पूर्ततेस जो काही विलंब होत आहे, त्या विलंबाबद्दल एका सामान्य धनगराचे मत खालील रचनेतून मांडण्याचा एक प्रयत्न...

दडपविण्याची भीती दाविता, आज तुम्ही हो कोणा रं ?
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। धृ।।

तलवारीचा इतिहास आमुचा, भीती न आम्हां मरण्याची
रक्ताच्या अखेरी थेंबापर्यंत, हिम्मत आमची लढण्याची
उगीच पुनुरावृत्ती इतिहासाची, करु कशाला देता रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०१।।

रास्त मागणी न्यायाची अन, रास्तच पद्धत मागण्याची
विलंब अर्थात नकार ही हो, शिकवण अहिल्या मातेची
पूर्ततेस हो विलंब इतका, आहे असहनीय आम्हां रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०२।।

शांततेचा हो अर्थ आमच्या, निर्बलता हा घेऊ नका
उद्रेक होता भावनांचा मग, मैदानातूनी पळू नका 
असंतोष वाढता समाजातला, फारच पडेल महागात रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०३।।

राजकारणी खेळ्या खेळूनी, वेळ फुकटच दवडू नका
अन पूर्ततेविना पुढील सत्तेची हो, स्वप्ने तुम्ही पाहू नका
भाव मनातील समाजाच्या हो, मिलिंद येथे मांडतो रं
नेस्तनाभूत होईल राजवट, दाविता धनगरी बाणा रं ।। ०४।।

- मिलिंद डोंबाळे

Thursday, June 15, 2017

आठवणींच्या हिंदोळ्यावर - ००२ (माझी तिरंदाजी)

प्रत्येक व्यक्ती जरी मोठा होत गेला, तरी त्याच्या बालपणीच्या आठवणी ह्या त्याच्या मनात कायम एक छोटेसे घर करुन राहत असतात. त्यात काही मजेशीर किस्से असतात, तर काही वेळा अज्ञानातून उध्दभवलेले रोमांचक प्रसंग असतात तर काही वेळा अजून काही... पण, अशा आठवणी त्या व्यक्तीच्या सोबत अखेरपर्यंत राहतात. ज्या ज्या वेळी अशा आठवणी आठवतात त्या त्या वेळी त्याचे मन भूतकाळात जाते आणि आठवणींनुसार भावनांचे रंग उधळू लागते. माझ्या बाबतीतही घडलेला असाच एक प्रसंग जो अजून मला घडला तसा आठवतो तो म्हणजे, मी माझ्या आईचा फोडलेला डोळा !

लहानपणी सर्वानाच अनेक छंद आणि खेळ खेळायची आवड असतेच. मला ही होती. छोटी-छोटी मातीची घरे बांधणे, बुद्धिबळ, क्रिकेटच्या खेळाडूंची कार्डे गोळा करणे, क्रिकेट खेळणे हे त्यापैकीच काही... ह्या खेळासोबत मी "काही दिवस" अजून एक खेळाला होता, तो म्हणजे धनुष्य-बाणाचा खेळ ! (काही दिवस हे अवतरण चिन्हांमध्ये का ठेवले हे पुढे कळेलच) इतर खेळाप्रमाणे त्याचीही गोडी होती. वेळूच्या पट्टीपासून दोरीने ताणून बनवलेला धनुष्य आणि काठीच्या सरळ तुकड्याचा बाण असे. काही अंतरावर थर्माकॉलचा एक तुकडा ठेवून त्यावर बाण मारले जात असत. पण, ह्या व्यतिरिक्त त्यातिल बाणाचे एक वैशिष्ट्य असे कि, मारल्या जागेत बाण घुसण्यासाठी त्याच्या टोकाला डांबराचा एक छोटा गोळा लावून त्यापुढे एक टाचणी टोचलेली असे. जेणे करुन टाचणीच्या पुढील टोकामुळे बाण त्या थर्माकॉल मध्ये घुसला जात असे. घरामागील बागेत माझा हा खेळ चालत असे. काहीवेळा मित्र असत काही वेळा एकटाच असे. एकंदरीत असा माझ्या खेळाची रुपरेषा होती.

असाच एकेदिवशी दुपारची झोप आणि अभ्यास संपवून, घरासमोरील अंगणात धनुष्य-बाणाचा हा खेळ खेळत होतो. आई आणि आमच्या घरात भाड्याने राहणाऱ्या पाटील कुटुंबातील काकू माझ्या मागे बोलत उभारल्या होत्या. थर्माकॉलच्या तुकड्यावर बाण मारण्यासाठी धनुष्याची दोरी ताणली होती. तेवढ्यात मागून आईची हाक ऐकू आली. आई काय म्हणत आहे हे पाहण्यासाठी मी ताणलेला धनुष्य-बाण तसाच धरुन मागे वळून पाहिले आणि तिच्या सोबत बोलू लागलो. पण तेवढ्यात धनुष्यातून ताणलेला बाण सुटला आणि तो थेट जावून नेमका आईच्या उजव्या डोळ्यातच घुसला. नेम नव्हता ना काही, पण बोलण्याच्या नादात सुटलेला बाण थेट डोळ्यात घुसला होता. बाणाला पुढे लावलेली टाचणी डोळ्यात घुसली होती. काय झाले याची कल्पना होती, पण करणार काय ?

आईजवळ उभ्या असणाऱ्या पाटील काकूंनी आईला घरात नेले. डोळ्यातून रक्ताची धार लागलेली. नाकातून देखील रक्त येत होते. वडिल ज्या शाळेत शिक्षक होते ती शाळाही जवळच असल्याने वडील देखील प्रसंग ऐकून शाळेतून लगेच आले. त्वरीत दवाखान्यात नेण्याची व्यवस्था झाली. बस स्थानकाजवळ असणाऱ्या डॉ. तंगडी (नेत्ररोगतज्ञ) यांच्या दवाखान्यात नेले गेले. डॉक्टरांनीही गांभीर्य ओळखून त्वरीत उपचार सुरु केला. डोळ्यातील बुबुळाच्या थोड्याच बाजूला, पांढऱ्या भागावर ती बाणाची टाचणी घुसली होती. जखम झाली होती. पण, सुदैवाने डोळा बचावला होता. अन्यथा, आईला एका डोळ्याला कायमचे मुकावे लागले असते. दोन टाके घालण्यात आले. मलम-पट्टी केली गेली. डॉक्टरही माझ्या 'पराक्रमाने' आश्चर्यचकित झाले होते. दवाखान्यातून निघून औषधे घेऊन आईसह आम्ही सर्वजण घरी आलो.

घरी आल्यावर भावाने तो धनुष्य-बाण मोडूनच टाकला. तसा मी ही गांगरून गेलो होतो. त्यात लहान आणि मी मुद्दाम केले नसल्याने मला कोणी रागाने काही बोलले नाही. आईची यथोचित सर्व काळजी घेण्यात आली. थोड्या दिवसातच आईच्या डोळ्यातील जखम भरुन आली. डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली. दुखणे थोडे दिवस होते पुन्हा तेही कमीकमी होत नाहीसे झाले. पण कॉलनीत आमचा 'पराक्रम' सर्वांना काळाला होताच. दादाचे मित्र 'लिंबाराम' (जागतिक दर्जाचा भारतीय तिरंदाज) म्हणून चिडवू लागले होते. दादाचा एक मित्र तर अजून देखील कधी भेटला तर लिंबाराम म्हणूनच बोलावतो. परंतू, त्या दिवसानंतर तो धनुष्य-बाणाचा खेळ थांबला, तो आजअखेर !

असा तो प्रसंग अजूनही आहे तसा आठवतो. कितीतरी दिवस-महिने-वर्षें ओलांडली तरी ह्या प्रसंगाची आठवण ताजी राहणार यात काही शंकाच नाही.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

Sunday, June 11, 2017

हिरकणी धनगरची शौर्यगाथा - एक सत्यकथाच !

(मराठी साम्राज्याची राजधानी किल्ले रायगडावरील हिरकणी बुरुजाबद्दल 'सत्यकथा कि दंतकथा' या विषयाच्या अनुषंगाने लिहिलेले मत)

किल्ले रायगडावरील हिरकणी धनगरची शौर्यगाथा सर्व महाराष्ट्राला माहित आहेच. रायगडावर दूध विकण्यासाठी गेलेली एक माता उशीर झाल्याने गडावरच अडकून राहते. तान्ह्या मुलाच्या ओढीने रात्री एक कडा उतरवून गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आपल्या घरी पोहोचते. छत्रपती शिवाजी महाराजांना हि गोष्ट कळताच ते तिला गडावर बोलावून तिचा सत्कार करतात, तो कडा भक्कम करुन घेतात आणि त्या बुरुजाला 'हिरकणी बुरुज' असे नाव देतात. हे त्या कथेचे सारांश रुप होय.

प्रथमतः एखादा लेखी पुरावा मिळत नाही म्हणून हिरकणी बुरुजाच्या वरील कथेला लगेच दंतकथेच्या रांगेत बसविणे थोडे आततायी होईल असे मला वाटते. इतिहासातील अनेक गोष्टींचे काही प्रत्यक्ष पुरावे मिळतात तर काही पुरावे अप्रत्यक्ष रुपात पाहावयास मिळतात. हिरकणीच्या साहसाची कथा हि जर खरंच दंतकथा असेल तर साहजिकच मनात खालीलप्रमाणे अनेक प्रश्न उपस्थित होण्यास वाव मिळतो - (०१) किल्ले रायगडावरील त्या बुरुजाला 'हिरकणी बुरुज' हेच नाव का दिले गेले ? (०२) किल्ले रायगडाजवळील वाळूसरे या गावाचे नामांतरण 'हिरकणीवाडी' असेच का करण्यात आले ? (०३) अठराव्या शतकातील कागदोपत्रात देखील 'हिरकणी' बुरुजाचा उल्लेख का असावा ? (०४) अनेक कवींना आणि शाहिरांना आपल्या लेखणीने 'हिरकणी'वर लिहण्याची व गाण्याची प्रेरणा का मिळावी ? (०५) शासनातर्फे मातांसाठी राबवल्या जाणाऱ्या अनेक पुरस्कारांचे अथवा योजनेचे नाव 'हिरकणी'च का ठेवले जावे ? (०६) पिढ्यानपिढ्या रायगडाच्या जवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनी 'हिरकणीची' कथा अजूनही का सांगावी ?

जर ती दंतकथाच असती तर गेली २००-२५० वर्षे आणि आजही तिचा विविध रुपाने उल्लेख केला गेला नसता, या गोष्टीचा देखील येथे विचार करणे महत्वाचे आहे.

किल्ले रायगडावर १७७५-७६ साली करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या कामांत हिरकणी बुरुजाचेही दुरुस्तीचे काम करण्यात आले होते, असा संदर्भ ही उपलब्ध आहे. ('रायगडाची जीवनगाथा'-आवळसकर, पृष्ठ-१३२) याचाच अर्थ किल्ले रायगडावर १७७५ च्याही आधीही तो बुरुज हिरकणी नावानेच प्रचलित होता.

आपणांस इतिहासातील अनेक घटना तसेच साहित्य हे मौखिक स्वरुपात जतन केल्याची उदाहरणेही पाहावयास मिळतात. हिरकणीच्या साहसाला जरी अलीकडच्या साहित्यकारांनी म्हणावे तितके (काही कविता, पोवाडे आणि नाटके वगळता) प्रकाशमान केले नसले आणि लिखित साहित्यात जतन करुन ठेवले नसले तरी, किल्ले रायगडच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांनी मात्र आपल्यातील साहसी मातेला मौखिक रुपात आजही जिवंत ठेवले आहे. किल्ले रायगडावर आजही तेथील गावकऱ्यांकडून आणि जवळपास सर्वच पर्यटक मार्गदर्शकांकडून हिरकणीची शौर्यगाथा पर्यटकांना सांगितली जाते.

आता काही प्रसिद्ध साहित्यकारांचे हिरकणी बुरुजाबद्दलचे मत पाहुयात;

(०१) "रायगड माय जिवाची गवळण बिनधोक | झोंक हिरकणी नांव ठेवुनी जाइ रोखठोक ||" - राम गणेश गडकरी ('श्री महाराष्ट्र गीत' या राम गणेश गडकरींच्या रचनेतून )

(०२) "उपलब्ध असलेल्या आणि पुण्याच्या ऐतिहासिक सरकारी दप्तरखान्यात जपलेल्या रुमालांत 'हिरकणीचा कडा', 'हिरकणी बुरुज', 'हिरकणीचा पहारा', इत्यादी शब्द असलेली अक्षरश: शेकडो अस्सल कागदपत्रे आज आपल्याला अभ्यासासाठी मिळतात. या हिरकणीच्या उल्लेखांवरून ही हिरा गवळणीची हकीगत वास्तव असावी, असे दिसून येते. महाराजांनी, हिरा गवळण ज्या भयंकर अवघड कड्यावरून उतरून गेली, त्या कड्याच्या माथ्यावर नव्याने भरभक्कम बुरुज बांधण्याची इमारत खात्याला आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर सुभेदार, खाते इमारत यांनी हा बुरुज बांधला." - बाबासाहेब पुरंदरे ('रायगडची व्यथा' ह्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये १४ जून २००८ रोजी प्रकाशित झालेल्या लेखातून)

(०३) "रायगडावरील हिरकणी बुरुजाची कथा कोण विसरेल? हिरकणी ही धनगरच. अभेद्य अशा समजल्या जाणा-या रायगडावरील चोरवाटही तिला माहीत होती. छ. शिवाजी महाराजांनी तिचा यथोचित सन्मान करुन ती चोरवाट बंद करण्यासाठी बुरुज बांधला. तो आजही हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो." - संजय सोनवणी  (संजय सोनवणी यांच्या ब्लॉगवर ०३ सप्टेंबर २०१२ रोजी प्रकाशित झालेल्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या लेखातून)

(०४) "The Hirkani Bastion is to the western side of the fort. Legend has it that a milkmaid, Hirkani, climbed down this precipice in order to reach her child and home, after the main gates had been closed for the night. Later when Shivaji heard of her feat he rewarded her and blocked the loophole by erecting a bastion. Looking at the sheer fall, it is difficult to believe that anyone could have climbed down from here." - मिलिंद गुणाजी ('Offbeat Tracks in Maharashtra' या पुस्तकातून, पृष्ठ -४२)

(०५) "गडाच्या सुरक्षिततेच्या व शत्रूच्या आक्रमणाच्या दृष्टीने हा सोपा मार्ग ठरू शकतो. हे हिरकणीमुळे महाराजांच्या लक्षात आले. महाराजांनी तो मार्ग तातडिने बंद केला. तेथे भरभक्कम बूरूज बांधण्याची आज्ञा दिली. हिराजी इंदुलकर यांनी हा बुरुज बांधला. छ.शिवाजी महाराजांनी त्यास हिरकणी बुरूज असे नाव दिले. आजही तो बुरूज हिरकणीच्या धाडसाची आणि मातृत्वाच्या अतुलनीय प्रेमाची साक्ष देतो." - होमेश भुजाडे ('धाडसी हिरकणी' या १४ मे २०१७ रोजी प्रकाशित झालेल्या लेखातून)

या व्यतिरिक्त, काही वर्षांपूर्वी हिरकणी या विषयावर एका इतिहास अभ्यासकाने लिहिलेल्या लेखात हिरकणीचे मूळ आडनाव 'हिरवे' असल्याचेही माझ्या वाचनात आले होते. भविष्यात अधिक संशोधन होऊन इतिहासातील या दुर्लक्षित मुद्द्याचे सत्यही समाजासमोर येईल अशी आशा आहे. कोणत्याही काल्पनिक, अंधश्रद्धात्मक तसेच चमत्कारिक गोष्टींचा उल्लेख नसणारी, एकाद्या मनुष्याला शक्य असणारी आणि मौखिक स्वरुपात जतनही केलेली हिरकणीची कथा आज अनेक बुद्धीजीवींनी (?) सत्यकथा म्हणून नाकारावी, याचे विशेष वाटते. असो... शेवटी ज्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
http://milind-dombale.blogspot.in/2017/06/blog-post_11.html

Sunday, June 4, 2017

मराठी कविता - शेतकऱ्याकडं देवा आता तरी ​​ध्यान दे


Shetkaryakad Deva Aata Tari Dhyan De । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh) ।
शेतकऱ्याकडं देवा आता तरी ​​ध्यान दे । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख) । 

Wednesday, May 31, 2017

मराठी कविता - ​धनगर​पुत्र आद्य चक्रवर्ती​ ​सम्राट चंद्रगुप्त मौर्य ​


​ । सम्राट चंद्रगुप्त मौर्य । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे ।
। Samrat Chandragupta Maurya । Marathi Kavita । Milind Dombale।

Tuesday, March 28, 2017

।। श्री मायाप्पा देवाची आरती ।।


। Shri Mayappa Devachi Aarti । Marathi Aarti । Kavita । Milind Dombale । 
। श्री मायाप्पा देवाची आरती । मराठी आरती । कविता । मिलिंद डोंबाळे 

Sunday, March 26, 2017

मराठी कविता - गुढीपाडवा

गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजे पशुपालकांच्या सातवाहन साम्राज्यातील एक अतिशय पराक्रमी राजा होय. सातकर्णीने इसवी सण ७८ मध्ये शकवंशीय नहपानाचा पुरता पराभव केला आणि त्याच्या शोषणातून प्रजेस मुक्त केले. या ऐतिहासिक घटनेमुळेच शालिवाहन शक (मूळ: सालाहन शक = साल+हन+शक, म्हणजेच ज्या साली शकांचे हनन झाले ते वर्ष) हे इसवी सणाच्या ७८ वर्षे मागे असते. ज्या दिवशी हा विजय मिळाला तो वर्षारंभ, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा ! गौतमीपुत्र सातकर्णीचा हा विजयदिवस प्रजेने मोठ्या उत्साहात साजरा केला आणि तोच विजयोत्सव गुढी उभारुन आपण आजही साजरा करतो. याच विषय आणि आशयावरील एक छोटी रचना - "गुढीपाडवा" 


। गुढीपाडवा । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख) ।  
। Gudi Padwa । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh) । 

Monday, August 22, 2016

मराठी कविता - एकटाच...


Courtesy - Mr. Nilesh Shelake & Mr. Sukhdev Ekal
एकटाच । मराठी कविता । मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Ektach । Marathi Kavita । Milind Dombale (Deshmukh)

Monday, May 23, 2016

​।। यशवंतायन ।।


एक रणझुंजार महायोद्धा, कनवाळू महाराजा, भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते, जात-धर्म-प्रदेश यांच्या पलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहणारे देशप्रेमी या व अशा अनेक विशेषनांनी महाराजा यशवंतराव होळकर यांची ओळख आवघ्या जगाला आहे. आजपर्यंत अनेक प्रख्यात साहित्यिकांनी आपल्या लेखनीतून यशवंतरावांची रणकीर्ती जगासमोर मांडली आहे. त्यामध्ये शाहीरांचे योगदानही उल्लेखनीय असेच आहे.  

महाराजांचे समकालीन शाहीर हरी बाळा आणि शाहीर अनंत फंदी तसेच नंतरच्या काळातही आपल्या पोवाड्यांनी महाराजांची गौरवगाथा समाजापर्यंत पोहचवणारे शाहीर दु.आ.तिवारी, शाहीर पांडुरंग खाडिलकर आणि शाहीर अमर शेख यांचे आज दुर्मिळ झालेले पोवाडे "यशवंतायन"च्या माध्यमातून श्री. मिलिंद डोंबाळे (देशमुख) यांनी प्रकाशित केले आहेत, ही बाब इतिहासप्रेमींच्या दृष्टीने स्वागतार्थ आहे. ​ 

  • ​पुस्तक - यशवंतायन
  • संपादक - मिलिंद डोंबाळे (देशमुख)
  • प्रकाशक - ज्ञानकुंज प्रकाशन
  • भाषा - मराठी
  • साहित्यप्रकार - पोवाडा संग्रह
  • पृष्ठसंख्या - ६०​
  • स्वागतमुल्य - रु.६०/-

वाचकांनी सदर कवितासंग्रह घरपोच मिळवण्यासाठी (+९१) ९४०४३५०५२८ / (+९१) ८९७५४९३५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Monday, April 11, 2016

मराठी कविता - वीर विठोजीराव होळकर

श्रीमंत तुकोजीराव (प्रथम) होळकर यांचे तृतीय पुत्र व महाराजा यशवंतराव होळकर यांचे जेष्ठ बंधू विठोजीराव होळकर यांची पुण्यातील शनिवारवाड्यापुढे १६ एप्रिल १८०१ रोजी अतिशय क्रुरतेने हत्तीपायी देऊन हत्या करण्यात आली. त्याच घटनेवर आधारित ही रचना... 

# वीर विठोजीराव होळकर  #

पुण्यातील शनिवारवाड्यापुढे रक्त ज्यांचे सांडले
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।धृ।।   

शिंदे-पेशवे मिळूनी होळकरशाहीवर उलटले
पुण्यामध्ये मल्हाररावांना ठार त्यांनी हो केले
कसेतरी हो यशवंत-विठोजी तेथूनी निसटले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०१।।   

यशवंतरावांनी उत्तरेतूनी स्वातंत्र्यलढा आरंभला 
विठोजीरावांनी दक्षिण प्रदेश स्वतःकडे घेतला 
संधीच्या शोधात अनेक प्रांत पायदळी तुडवले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०२।। 

महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्रावरी हो जावूनी धडकले
पंढरपूर-कुरकुंभ-मंगळवेढे मुक्त करुनी घेतले
विठोजीरावांनी बंडखोरीचे दक्षिणेत वादळ उठविले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०३।। 

इकडे पुण्यातील नीतीमत्ता पुरतीच ढासळली 
धनिकांच्या लुटीसंगे सामान्य जनताही त्रासली 
एकंदरीतच पुण्यामध्ये अराजकतेचे वारे वाहले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०४।। 

अनेक सरदार विठोजीरावांच्या पाठी उभे राहिले 
लढाया आलेले बावनपागे सैन्यातच सामील जाहले 
पेशव्यांच्या पानसे-पटवर्धनांचे पराभव हो गाजले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०५।। 

सैन्यासह विठोजीराव पुरंदर येथे पोहोचले
इंग्रजी फलटनींसह पेशव्यांनी फौजेस धाडले 
विठोजीरावांना पराभूत करूनी कैदेत हो घेतले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०६।। 

विठोजींना शनिवारवाड्यापुढे काढण्यासह आणले 
बाजीराव हा खेळ पाहण्यास नगारखान्यात बसले 
विठोजीरावांच्या अपमानाचे खेळ प्रथम चालवले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०७।। 

विठोजीरावांच्या पाठीवरती दोनशे कमचे ओढले 
रक्तरंजित पाठ पाहूनी पेशवे व इतर आनंदले 
मराठी दौलतीच्याच वीरावर असले क्रौर्य साधले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०८।। 

इतक्यात माहूत मैदानामध्ये हत्ती घेऊनी आले 
साखळदंडांनी विठोजीरावांना हत्तीपायी बांधले 
जखमांच्या असंख्य वेदनांसह ते फरफटू लागले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।०९।। 

विठोजींच्या कुटुंबासमोरच  हा क्रुरखेळ चालविला 
पत्नीने पतीला वाचविण्यासाठी आक्रोश मांडिला  
दया न करता सर्वजण हो मृत्यूखेळ पाहत बसले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१०।। 

जीवाचा हत्तीपायीं न येण्यासाठी आटापिटा चालिला 
मूर्च्छा येऊनी पडले तरीही मृत्यूखेळ सुरुच राहिला 
अंती हत्तीपायी शिर आल्याने विठोजींनी प्राण सोडले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।११।। 

खेळ विठोजींच्या विटंबनेचे नाही येथेच थांबले 
शव पुणेकरांच्या दृष्टीसुखासाठी मैदानातच ठेवले 
विठोजींचे शव मैदानातूनी दुसऱ्या दिवशी उचलले    
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१२।। 

विठोजींच्या हत्येची बातमी यशवंतरावांस समजली 
मग यशवंतरावांनी दक्षिणेत आक्रमणे गाजवली 
पडसाद विठोजींच्या हत्येचे मराठी दौलतीस भोवले  
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१३।। 

अजुनी मातीचा कणकण सांगे घडलेला इतिहास
वाचा फोडे विठोजीरावांवर झालेल्या अन्यायास
मिलिंदच्या लेखणीनी सदा सत्यइतिहासावर लिहले 
होळकरांचे विठोजीराव स्वातंत्र्यासाठी झुंजले ।।१४।।

© मिलिंद डोंबाळे (देशमुख)​
www.milind-dombale.blogspot.com​
-------------------------------------------------
Milind Dombale (Deshmukh) । Marathi Kavita । Veer Vithojirao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) । मराठी कविता । वीर विठोजीराव होळकर 

Friday, March 25, 2016

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज आणि होळकर महाराजे

काही दिवसांपासून 'फर्ग्युसन कॉलेज, पुणे' मधील 'जमीन आणि मदत' या विषयांवर सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्यामध्ये आणखीन एका मुद्द्याचा समावेश मी करु इच्छितो तो म्हणजे - तत्कालीन होळकरशाहीचे राजे, महाराजा शिवाजीराव होळकर (११ नोव्हेंबर १८५९ - १३ ऑक्टोबर १९०८) यांनी डेक्कन एज्युकेशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक मदत केली होती. तसेच फर्ग्युसन कॉलेजसाठी कोणतीही अट न घालता पुण्याचा होळकरांचा पिढीजात वाडा स्वतः होऊन देऊन टाकला होता.

होळकरशाहीचे गाढे अभ्यासक डॉ. गणेश मतकर त्यांच्या प्रबंधात लिहितात - "लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर या लोकसेवारत विद्वानांना इंदूरात समक्ष बोलावून आणि त्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांच्या शैक्षणिक चळवळींना अपेक्षेबाहेरचे अर्थसाहाय्य केले. फर्ग्युसन कॉलेजकरिता कुठलीच अट न घालता आपला पुण्यातील पिढीजात वाडा आपण होऊन देऊन टाकला." (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-२९२)

याव्यतिरिक्त, महाराजा शिवाजीराव होळकर यांच्यानंतर गादीवर आलेल्या महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी सुद्धा ही परंपरा सुरुच ठेवली. महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांनी फर्ग्युसन कॉलेजच्या बायो-लॉजिकल लायब्ररीकरिता १९१५-१६ मध्ये २०,००० रुपयांची भरघोस आर्थिक मदत केली. (संदर्भ : होळकर रियासतीचा सांस्कृतिक इतिहास - डॉ. गणेश मतकर, पृष्ठ-३२७)

पण, सध्याच्या एकाही चर्चेत महाराजा शिवाजीराव होळकर आणि महाराजा तुकोजीराव (तृतीय) होळकर यांचे साधे नाव देखील घेतले जात नाही.

काय म्हणावे ? काय करावे ? चालू द्यावे…

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
www.milind-dombale.blogspot.com

Monday, March 7, 2016

एक शोकांतिका…

आज जागतिक महिला दिनानिमित्त सोशल मेडियावर अनेक संदेश तसेच पोस्टर्स पहावयास मिळाले. त्यामध्ये भारतातील तसेच परदेशातील अनेक कर्तृत्वान महिलांचा उल्लेख होता. या माध्यमातून इतिहासातील कर्तृत्वान महिलांच्या कार्याचा जागर नव्याने समाजापुढे येतो, ही आनंदाचीच बाब आहे. पण त्यातील अतिशय खेदाची गोष्ट म्हणजे, अनेकांना (अक्षरश: काही सोडले तर सर्वांनाच) धनगर समाजातील किंवा होळकरशाहीतील कर्तृत्वान महिलांचा मात्र विसर पडलेला दिसतो. सदरच्या गोष्टीमागे समाजातील छुपी जातीयता ही प्रामुख्याने कारणीभूत आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

ज्या स्त्रीने कुटुंबातील सर्वांच्या मृत्यूचे दु:ख पचवत तब्बल २८ वर्षे लोककल्याणकारी राज्य केले. तलवार हातात घेवून अनेकवेळा रणांगणात शत्रूला धूळ चारली. १८व्या शतकात रयतेसाठी अनेक नवीन लोककल्याणकारी संकल्पना सत्यात उतरविल्या. बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तसेच संपूर्ण भारतात हजारो मंदिरांची उभारणी केली. सामान्य रयतेसाठी शेकडो अन्नछत्रे व पाणपोई यांची उभारणी केली, अशा एकमात्र पुण्यश्लोक राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख कर्तृत्वान महिलांच्या अनेक यादीत नसावा ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

बाळाच्या प्रेमापोटी रायगडासारखा अभेद्य किल्ला रात्री उतरून छत्रपती शिवरायांसह सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणाऱ्या साहसी माता म्हणजेच वीर हिरकणी धनगर होय. यांच्याही साहसाचा समाजास विसर पडलेला दिसत आहे.

ज्यांनी पतीच्या मृत्यूनंतर आपल्या लहान मुलाला गादीवर बसवून अनेक वर्षे (१८११-१८१७) होळकरशाहीची सूत्रे समर्थपणे सांभाळली त्या म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पत्नी महाराणी तुळसाबाई होळकर होय. त्याचसोबत, ज्यांनी १८१८ मध्येच इंग्रजांशी सर्वकश युद्ध पुकारले अशा महाराजा यशवंतराव होळकर यांच्या कन्या आद्य क्रांतीवीरांगना भीमाबाई होळकर यांचा उल्लेख ही आपल्याला सदरच्या विस्मृतीतील महिलांच्या यादीत करावा लागेल.

मित्रहो, कर्तृत्वान महिलांच्या यादीत धनगर समाजातील या व अशा अनेक महिलांचा समावेश होवू शकतो, परंतू जातीयतेच्या नजरेतून इतिहासाकडे पाहणाऱ्यांना कोण थांबवू शकेल ? सर्व बुद्धीजीवी समाजबांधवांनी एकत्र येवून या कर्तृत्वान महिलांच्या कार्याला प्रकाशित करून त्याचा यथोचित सन्मान करणे, म्हणजेच महिला दिनानिमित्त या सर्व कर्तृत्वान महिलांना केलेले खरेखुरे अभिवादन ठरेल.

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)
(+९१)८९७५४९३५०५

Wednesday, January 27, 2016

मराठी कविता - महाराजा यशवंतराव होळकर

भारत भूमीच्या रक्षणाची, केली ज्यांनी गर्जना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।धृ।।

इंग्रजांना हरेक युद्धांत, ज्यांनी चारली हो माती
पळता भुई थोडी हे करती, इंग्रजांनी खाल्ली भीती
ज्यांच्या राष्ट्रकार्यामुळे, अभिमान वाटावा मना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०१।।

होळकरी काव्याने हे, महाराजा झुंजले किती
होळकरी बांडा झेंडा ज्यांनी, गाजविला भारती
ज्यांच्या पराक्रमापुढे झुकती, अजुनी सर्व माना
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०२।।

एकाकी झुंजले परी, कधी नाही हार मानिली
सदा तलवारीच्या टोकावर, ज्यांनी आव्हाने पेलली
शिकवण ज्यांची सदा होती, ठेवा ताठ पाठीचा कणा
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०३।। 

देशभक्तीमुळे इतिहासात जे, अजरामर हो झाले
स्वातंत्र्याची प्रथम ठिणगी जे, मनी पेटवूनी गेले
ही स्तुतिसुमने वाहतो, मिलिंद ज्यांच्या चरणां
महाराजा यशवंत होळकर, नाव तयांचे जाणा ।।०४।।​

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)

'आम्ही धनगर' या कवितासंग्रहातून…

Saturday, January 2, 2016

मराठी कविता - पेटवूया मशाल क्रांतीची


। Milind Dombale । Marathi Kavita ।  Petavuya Mashal Krantichi । 
। मिलिंद डोंबाळे । मराठी कविता । पेटवूया मशाल क्रांतीची​ ।​


Sunday, December 27, 2015

​​'आम्ही धनगर' - कवितासंग्रह



प्राचीन काळापासून पशुपालन करणारा समाज, वैभवशाली आणि गौरवशाली इतिहास घडवणारा समाज, आपल्या पशुपालन या पारंपारिक व्यवसायामुळे सर्वत्र पसरलेला व तेथील भाषेनुसार वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा समाज आणि एवढ्या विविधतेत देखील आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेची एकोप्याने ठेवण करणारा समाज म्हणजेच धनगर समाज ! याच धनगर समाजातील काही महत्वाच्या व्यक्तिरेखा तसेच धनगर समाजाच्या सामाजिक जीवनावर विविध अंगानी रचलेल्या कवितांचा सचित्रसंग्रह म्हणजेच 'आम्ही धनगर'.

'ज्ञानकुंज प्रकाशन'तर्फे प्रकाशित 'आम्ही धनगर' या कवितासंग्रहात धनगर समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच ऐतिहासिक गोष्टींना प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सदर कवितासंग्रहामध्ये श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, महाराणी अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, वीरांगना भीमाबाई होळकर, वीर शिंग्रोबा धनगर तसेच बापू बिरू वाटेगावकर यांच्यावरील कवितांचा समावेश आहे. धनगर समाजाचे प्रमुख कुलदैवत श्री खंडोबा यांच्यावरील दोन कविता देखील वाचकांना नक्की आवडतील. त्याचबरोबर धनगर आरक्षण आणि धनगर समाजाच्या सामाजिक जीवनावरील काही कवितांचा समावेशही 'आम्ही धनगर' मध्ये करण्यात आला.      

  • पुस्तक - आम्ही धनगर     
  • कवी - मिलिंद डोंबाळे     
  • प्रकाशक - ज्ञानकुंज प्रकाशन     
  • भाषा - मराठी     
  • साहित्यप्रकार - कवितासंग्रह     ​
  • पृष्ठसंख्या - ८०​
  • स्वागतमुल्य - रु.१००/-

​वाचकांनी सदर कवितासंग्रह घरपोच मिळवण्यासाठी (+९१) ९४०४३५०५२८ / (+९१) ८९७५४९३५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर 'आम्ही धनगर' हा कवितासंग्रह 'BookGanga' वरदेखील पुढील संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे - http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4743727610679215563?BookName=Amhi-Dhangar 

- मिलिंद डोंबाळे​

Thursday, December 24, 2015

​चित्रपट 'बाजीराव मस्तानी' आणि माहेश्वरचा 'अहिल्या फोर्ट'…



१८ डिसेंबर २०१५ रोजी 'बाजीराव मस्तानी' हा हिंदी चित्रपट प्रकाशित झाला. मराठीतील प्रसिध्द लेखक ना.स.इनामदार यांच्या 'राऊ' या कादंबरीवर आधारित हा चित्रपट प्रकाशनापूर्वी तसेच प्रकाशनानंतर ही अनेक कारणांनी प्रकाश झोतात राहिला.

सदर चित्रपटात बाजीराव पेशवे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांच्यातील नात्याचाही उल्लेख एका दृश्यामध्ये दाखविण्यात आला आहेच. पण ह्या व्यतिरिक्तही एके ठिकाणी अहिल्यादेवींनी उभारलेल्या माहेश्वर येथील किल्ल्याचे 'अहिल्या फोर्ट'चे दृश्यही (थोडेसे बदल करुन) चित्रपटात पहावयास मिळते. चित्रपटात बुंदेलखंडच्या विजयानंतर बाजीराव पेशवे ज्यावेळी छत्रपतींना भेटावयास निघतात त्यावेळी दाखविण्यात आलेला महाल हा अहिल्यादेवींनी माहेश्वर येथे नर्मदेच्या काठावर उभारलेला 'अहिल्या फोर्ट' आहे.

या आधीही अनेक हिंदी तसेच तमिळ मधील चित्रपटांचे तसेच मालिकांचीही अनेक दृश्ये अहिल्यादेवींनी उभारलेल्या माहेश्वर येथील किल्ल्यात 'अहिल्या फोर्ट' येथे चित्रित करण्यात आली आहेतच. इतक्या वर्षांनंतर देखील होळकरशाहीच्या वैभवशाली ऐतिहासिक वास्तूंची लोकांना अशा अनेक माध्यमांतून प्रचीती मिळत राहणे ही आनंदाचीच बाब आहे. 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख)​

Tuesday, September 22, 2015

मराठी कविता - सुभेदार मल्हारराव होळकर​ (Subhedar Malharrao Holkar)


Milind Dombale (Deshmukh) Marathi Kavita Subhedar Malharrao Holkar
मिलिंद डोंबाळे (देशमुख) मराठी कविता सुभेदार मल्हारराव होळकर 

Wednesday, September 9, 2015

Shri Sant Ramjibaba (श्री संत रामजीबाबा)



पुणे शहराच्या लगतच चिंचवड गावापासून अगदी जवळच असलेल्या चांदखेड ता. मावळ या गावी पेशवाईचे काळात धनगर (खाटीक) या समाजात रामजीबाबा नावाचे एक संत पुरुष होऊन गेले. रामजीबाबांचा व्यवसाय म्हणजे मेंढरांचे पालन-पोषण करणे हा पिढीजात धंदा होता. खंडोबाची उपासना त्यांच्या घराण्यात परंपरेने चालू होती. त्या उपसनेमधूनच त्यांच्या ठिकाणी असे काही वैराग्य निर्माण झाले की, संसारी असून देखील ते विरागी बनले. प्रभूचिंतनात त्यांचा सर्व काळ जात असे व चिंतनामधूनच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली.

रामजीबाबा हे चांदखेड गावातील घोलप घराण्यातील. घोलप घराणे खंडोबाचे भक्त होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चांदखेड या गावीच झाला. रामजीबाबांचा संसार मावळ तालुक्यातच होता. त्या भागातील लोकांना वाटले की, संत तुकारामांनंतर हा एक त्यांच्याच मार्गाने जाणारा कोणीतरी दिव्य साधुपुरुष आपल्यामध्ये आवतरला आहे. त्यामुळे तेथील लोक बाबांच्या भजनी लागले. रामजीबाबांनी त्यांच्या आयुष्यात काही चमत्कार केल्याचे दाखले नाहीत. परंतु एकही चमत्कार न करतां देखील केवळ भक्तीमार्गांमुळे हजारो लोक त्यांच्या भजनी लागले होते.

रामजीबाबांनी तुकाराम महाराजांचे प्रमाणेच प्रपंच साधून परमेश्वाची सेवा व आराधना केली. रामजीबाबांची ओळख त्यावेळच्या समाज बांधवांना पटली नाही. परंतु समाजाच्या अत्यंत कठीण अवस्थेत त्यांनी लोकांना धीर दिला व भक्तीमार्गाने संकटाला सामोरे जाण्याचे शिकवले. काही लोकांनी त्यांची अवहेलना केली परंतु संताना देखील काही काळ अनुकूल असावा लागतो. त्या काळात अनेक संत महात्मे होऊन गेले. रामजीबाबा हे खंडोबाचे परमभक्त म्हणून ओळखले जावू लागले. समाजाला मार्गदर्शन करुन त्यांनी खंडोबाची भक्ती करण्याचा उपदेश केला.

रामाजीबाबा यांनी चांदखेड या गावीच आपला देह ठेवला व ते वयाच्या ५४ व्या वर्षी खंडोबाचे चरणी विलीन झाले. तो दिवस म्हणजे पौष शुध्द पौर्णिमेचा होता. दरवर्षी या तिथीला रामजीबाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरी केली जाते. महाराष्ट्रात शेकडो भक्त त्याठिकाणी जमतात. भजन, कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेतात. मुंबई येथील सर्वश्री बेंद्रे, खराटे, घोणे, घोडके या घराण्यातील लोक मोठ्या संख्येने येवून हा पुण्यतिथीचा सोहळा पार पडतात. समाजातील बाबांच्या भक्तांनीच चांदखेड येथील समाधी मंदिराचा जीर्णोद्धार करुन भव्य सभा मंडप उभारला आहे.

अशा थोर संताचे चरणी आमचे विनम्र अभिवादन -  
पवित्र जे कुळ पावन तो देश । जेथे हरिचे दास जन्म घेती ।। 
कर्म धर्म त्याने झाला नारायण । त्याचेचि पावन तिन्ही लोक ।।  

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com 
(टिप - सदरचा लेख मी लिहिला नसून, एका जुन्या पुस्तकात तो प्रकाशित झाला होता व ते पृष्ठ फक्त माझ्या हातीं लागले. प्रयत्न करुनही लेखक व पुस्तकाचे नाव कळू शकले नाही. जर कोणास लेखक किंवा पुस्तकासंबधी काही माहिती असल्यास जरुर कळवावे)

Saturday, September 5, 2015

Dr. Santuji Ramji Lad (डॉ. संतुजी रामजी लाड)

​​ 

डॉ. संतुजी रामजी लाड हे एक थोर समाजसेवक व नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले तसेच महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या सोबत त्यांनी मोलाचे समाजकार्य केले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनकार्यांचा घेतलेला हा एक संक्षिप्त आढावा; 

इ.स. १८४१ मध्ये एका खाटीक-धनगर कुटुंबात जन्मलेल्या संतुजी यांनी ठाण्याच्या मिशनरी शाळेत आपले शिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला व एक निष्णात डॉक्टर बनले. डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांचा 'सत्यशोधक समाज' आणि 'भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ' यांच्याशी आलेला संबंध व त्या माध्यमांतून ​​त्यांनी केलेले समाजकार्य यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. 

डॉ. संतुजी लाड आणि सत्यशोधक समाज :
डॉ. संतुजी लाड यांच्या जीवनावर कायम महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव राहिला. त्याच विचारांमुळे डॉ. संतुजी लाड सत्यशोधक समाजाकडे आकर्षिले गेले आणि पुढे सत्यशोधक समाजाचे एक आघाडीचे नेते बनले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांनी अनेक वर्षे समाजकार्य केले.​ सत्यशोधक समाजाच्या इ.स.१८८५ च्या ठाणे येथील वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नाशिक येथे इ.स.१९१२ साली भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे त्यांनी म्हटले होते. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनाचा खर्च डॉ. संतुजी लाड यांनी केला होता. 'दीनबंधू' ह्या साप्ताहिक मुखपत्र त्याकाळी चालविले जात असे. पण काही आर्थिक कारणांनी ते डबघाईला आले. त्यावेळी 'दीनबंधू' या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक मदत करून हे वृत्तपत्र बंद पडू दिले नाही. 'दीनबंधू' हे साप्ताहिक मुखपत्र पुन्हा नव्याने सुरु झाले, पण त्यासाठीं डॉ. संतुजी लाड यांना आपली सर्व संचित संपत्ति खर्चावी लागली होती. 'दीनबंधू'ने  इ.स.१८९६ च्या २३ फेब्रुवारीच्या अंकात डॉ. संतुजी लाड यांचा 'प्रथम-भाषणकार' असा उल्लेख केला होता. 

डॉ. संतुजी लाड आणि भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ:
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यांसाठी स्थापन केलेल्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळामध्ये डॉ. संतुजी लाड हे एक महत्त्वाचे मार्गदर्शक व साहाय्यकारी होते. तसेच मंडळाच्या पाच आद्य संस्थापकांपैकी डॉ. संतुजी लाड हे एक होते. त्या पाच ही संस्थापकांची नावे व पदे पुढीलप्रमाणे ; १. महर्षि विठ्ठल रामजी शिंदे (सरचिटणीस), २. सर नारायण चंदावरकर (अध्यक्ष), ३. शेठ दामोदरदास सुखडवाला (उपाध्यक्ष), ४. नारायणराव पंडित (खजीनदार) आणि ५. डॉ. संतुजी रामजी लाड (अधीक्षक). भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ अनेक सामाजिक तसेच प्रबोधनात्मक उपक्रम चालवत असे, त्याचाच भाग म्हणून मंडळाने इ.स. २२ नोव्हेंबर १९०६ ते इ.स.१९०८ च्या अखेर पर्यंत परळ येथे एक मोफत दवाखाना चालवला होता. ​​या दवाखान्यात डॉ. संतुजी लाड स्वतः रोज सकाळी ठाण्याहून स्वखर्चाने येत असत. त्यासाठीचा प्रवासखर्चही ते कधी मंडळाकडून घेत नसत. अस्पृश्तेचे प्रमाण त्या काळात अधिक होते. अस्पृश्य वर्गातील रोग्याला डॉक्टर साधे शिवूनही घेत नसत. पण त्या काळात डॉ. संतुजी लाड अस्पृश्य रोग्याला शिवून, अतिशय प्रेमळपणाने त्याची तपासणी करीत असत व उपचार करुन औषध देत असत. डॉ. संतुजी लाड यांच्या सेवावत्तीबद्दल व त्यांनी केलेल्या साहाय्याबद्दल महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांना फार कृतज्ञता वाटत होती. डॉ. संतुजी लाड ह्यांच्या जोडीने डॉ एस.पी.नाशिककर हे ही मंडळाच्या दवाखान्याचे काम पाहत असत. डॉ. संतुजी लाड केवळ दवाखान्यातच उपचार करत असत असे नव्हते, तर ते आजूबाजूच्या गरीब वस्तीतील घरांमध्ये जाऊन गरीब रोग्यांना मोफत औषधोपचार देखील करत असत. या वैद्यकीय कार्यांव्यतिरिक्त डॉ. संतुजी लाड यांनी ठाणे येथे रात्रीची शाळाही चालवली होती. 

डॉ. संतुजी लाड हे दीनदुबळ्यांना मदत करायला सदैव तत्पर असत. स्वभावाने अतिशय प्रेमळ असणारे डॉ. संतुजी लाड कोणीही संकटांत सापडला असे कळले की, त्याच्या साहाय्यासाठी धावत असत. आपल्या संपत्तीचा उपयोग  त्यांनी सार्वजनिक कामासाठी व गोरगरिबांच्या साहाय्यासाठीच केला. पंढरपूर ऑर्फनेजमधून त्यांनी दोन मुली समाजाकडून मागून घेतल्या व त्यांचें प्रतिपालन करून त्यांची लग्नेंही लावून दिली. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात देखील मुंबई येथील मराठा प्लेग हॉस्पिटलमध्ये 'हाऊस-सर्जन' म्हणून त्यांनी काम केले. प्लेग हॉस्पिटलांत संपर्कात आलेल्या एका मुलाचे त्यांनी स्वतः उत्तम रीतीने संगापेन केले होते. अत्यंत निस्वार्थीपणाने समाजाची शेवटपर्यंत सेवा करणाऱ्या डॉ. संतुजी लाड यांचे कार्य वाखाण्याजोगेच आहे. अशा ह्या थोर समाजसेवकाचे इ.स. १९१६ च्या अखेरीस पक्षाघाताच्या विकाराने निधन झाले. 

डॉ. संतुजी लाड यासारख्या एका निस्वार्थी थोर समाजसेवकाचे कार्य आपणां सर्वांपर्यंत पोहोचावे एवढीच हा लेख लिहिण्यामागील माफक अपेक्षा ! 

- मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
http://milind-dombale.blogspot.qa/2015/09/blog-post.html

संदर्भ - 
१. Website - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई प्रस्तुत : महर्षि विठ्ठल रामजी शिंदे -​ समग्र साहित्य 
२. Website - Prabodhankar K S Thackeray's Life & Literature, Official Website 
३. Book - 'Shahu Chhatrapati : A Royal Revolutionary' (1976) By Dhananjay Keer 
४. Book - Jotirao Phule (1996) By Tarkteerth Laxmishastri Joshi, Daya Agarval 
५. Book - 'Non-Brahman Movement In Maharashtra' (1989) By M.S.Gore

Friday, August 28, 2015

मल्हारतंत्र



श्रीमंत सुभेदार थोरले मल्हारराव होळकर यांचा सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा अर्थात 'मल्हारतंत्र' ! 'सपाट मैदानी प्रदेशातील गनिमीकावा', ‘होळकरांचा-गनिमीकावा', 'होळकरी-कावा' किंवा 'मल्हारतंत्र' अशा अनेक नावांनी परिचित असलेला गनिमीकाव्याचा हा प्रकार 'मल्हारतंत्र' या नावानेच जास्त ओळखीचा आहे.

मल्हारबांच्या घोड्यांच्या टापांनी जवळपास अवघा भारत पिंजून काढला. मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे गरुडस्तंभ ठरलेल्या मल्हाररावांनी अनेक युद्धात हेच तंत्र वापरले. दिल्लीच्या तख्तावर वर्चस्व ठेवले. त्यांच्यानंतर महाराजा यशवंतराव होळकर यांनीही पुढे याचाच वापर केला. मॉन्सनचा भीषण पराभव हे देखील याचेच उदाहरण !

होळकरांच्या या तंत्राविषयी प्रसिद्ध इतिहासकार श्री. यशवंत वासुदेव खरे (ऐतिहासिक लेख संग्रह - १५) लिहितात  -  “होळकरांचा गनिमीकावा विचित्र होता.  मैदानात समोरासमोर इंग्रजाशी लढण्याच्या भानगडीत पडत नसे. पहिल्याने घोडेस्वाराच्या लहान लहान टोळ्या दिसू लागत या लहान टोळ्याच्या पाठीशी घोडेस्वाराच्या मोठमोठ्या टोळ्या असत. इंग्रजी फौज चालून आली तर हे घोडदळ पळू लागे. इंग्रजी फौजेची पाठ वळताच हजारो मराठे घोडेस्वार चहूकडून हल्ले करीत आणि पिछाडीवर लांडगेतोड करीत. शत्रूभोवती घिरट्या घाल घालून मराठे संधी सापडेल तेंव्हा शत्रूची कत्तल करीत...” (सदर पुरावा उपलब्ध करून दिला तो आमचे पुणे स्थित मित्र सचिन शेंडगे यांनी…)

प्रसिध्द इतिहास संशोधक व लेखक श्री. संजय सोनवणी यांचे देखील मल्हारतंत्राविषयी मत आपण जाणून घेऊयात, त्यांच्या 'धनगर-गवळ्यांच्या अवनतीचा कालखंड' या त्यांच्या प्रकाशित लेखामध्ये ते लिहितात - "मल्हाररावांनी उत्तर तुडवली. सपाट प्रदेशातील गनीमी कावा विकसीत केला...इतका कि त्याला "मल्हारतंत्र" म्हटले जाते. पानिपत युद्धात गेलेली मराठेशाहीचे पत काही महिन्यांत परत मिळवली. इंग्रजांनाही गनीमी काव्यानेच धुळ चारली."

तसेच श्री. संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या महाराजा यशवंतराव होळकर यांच्या चरीत्र पुस्तकात ते लिहितात - "यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो हे खोटे आहे, हे त्यांनी सिध्द करुन दाखवले. मॉन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा खरेतर होळकरी-काव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युध्दशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पाळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून, भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत, तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत न्हेत कसे संपवावे, याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारां पेक्षाही अधिक ठार झाले."

तरी देखील गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशातच उपयुक्त असतो असे म्हणणाऱ्यांना काय म्हणावे ?

- मिलिंद डोंबाळे
www.milind-dombale.blogspot.com

Saturday, August 22, 2015

रायसीना-ग्राम और होलकर राजवंश

"इंदौर राज्य के होलकर राजवंश के १९११ तक के दस्तवेजोंसे यह ज्ञात होता है की दिल्ली का रायसीना ग्राम इंदौर राज्य के मालकी में सन १९११ तक था। सन १९११ में ही होलकर नरेशने इस रायसीना ग्रामको ब्रिटिश सरकार के अतीथ सोपा और आज हमारा राष्ट्रपती-भवन, संसद-भवन, सेक्रेट्रिएट की भव्य वास्तू हमारे इंदौर के होलकरोंके रायसीना ग्रामपर ही स्थापित है।"

- श्री. सुनील गणेश मतकर, 
संदर्भ- 'फुटी कोठी', आयुष अगरवाल द्वारा सन २०१४ में बनाई गई डॉक्युमेंट्री  

श्री. सुनील गणेश मतकर यह प्रसिध्द इतिहासकार डॉ. गणेश मतकरजी के पुत्र है। डॉ. गणेश मतकरजी ने 'होलकर राजवंश का २२० वर्षों का सांस्कृतिक, साहित्यिक और वाङ्ग्मयीन इतिहास' इस विषयपर सन १९९४ में प्रबंध लिखा और उसके लिए उन्हें डॉक्टरेट पदवी प्राप्त है। 

संकलन - मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
www.milind-dombale.blogspot.com

Wednesday, August 12, 2015

आषाढ अमावास्या (गटारी अमावास्या)

आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणारी अमावास्या 'आषाढ अमावास्या' म्हणून सर्वत्र ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात विविध नावांनी व विविध प्रकारे हा दिवस साजरा केला जातो. 
 
आषाढ अमावास्या ​कर्नाटकात 'भिमाना अमावास्या', आंध्रप्रदेशात 'चुक्कला अमावास्या', तामिळनाडू मध्ये 'चुक्कला अमावास्या व्रतम' या नावांनी साजरी केली जाते. गुजरात,राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश तसेच हिमाचल प्रदेश मध्ये हा दिवस 'हरियाली अमावस' म्हणून साजरा केला जातो. कर्नाटकात या दिवशी 'ज्योतीभिमेश्वर व्रत' तसेच 'पती-संजीवनी व्रत' पाळण्यात येतात तर उत्तर भारतातील काही शहरांत या दिवशी यात्रांचे आयोजनही करण्यात येते. तसेच काही ठिकाणी पितृपूजेसाठी हा दिवस शुभ मानला जातो तर काही ठिकाणी या दिवशी 'दिप पूजा' व 'पंच-महाभूत पूजा' केली जाते.
 
महाराष्ट्रात हा दिवस गटारी अमावास्या म्हणून साजरा करण्यात येतो. आषाढ अमावास्येनंतर येणाऱ्या श्रावण महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश लोक मांसाहार तसेच दारु सेवन वर्ज्य करतात. वैद्यकीयदृष्ट्या देखील ही गोष्ट योग्य मानली गेली आहे. श्रावण महिन्यात मान्सून (पावसाला) जोमात असतो व मानवी शरीरही अधिक संवेदनाक्षम असते, त्यामुळे जड (मांसाहार) आहार तसेच दारु सेवन वर्ज्य करणे आरोग्यासाठी फायदयाचेच ठरते. काही लोक आहाराचे प्रमाण कमी करण्यासाठी पूर्ण महिनाभर उपवास धरतात व हलक्या उपवासाच्या पदार्थांचेच सेवन करतात. पुढील महिनाभर मांसाहार व दारु सेवन वर्ज्य करावयाचे असल्यामुळे लोक या दिवशी अधिक प्रमाणात मांसाहार व दारु सेवन करुन हा दिवस साजरा करतात.
 
आषाढ अमावास्येच्या दिवशी लोक मांसाहार व दारु सेवन करुन 'त्याला' (श्रावण महिन्यात अनिष्ट मानल्या गेलेल्या आहाराला) पुढील महिनाभरासाठी निरोप देतात व श्रावण महिन्याच्या स्वागताला सज्ज होतात. गटारी अर्थात मांसाहार व दारु यांचे सेवन महिनाभरासाठी वर्ज्य करणे व अनिष्ट घटकांचे शरीरातून निःसारण करणे होय आणि म्हणूनच आषाढ अमावास्येला महाराष्ट्रात 'गटारी अमावास्या' म्हणून संबोधले व साजरे केले जाते.
 
(टिप - वरील सर्व माहिती विविध वेबसाईटसवर प्रकाशित झालेल्या लेखांमधून संकलित करण्यात आली आहे.)
 
मिलिंद डोंबाळे (देशमुख)
गुरुवार, दि - १३ ऑगस्ट २०१५

Monday, August 10, 2015

​'धनगर समाज-प्रबोधन' की 'सामाजिक-द्वेष' ?

आजकाल धनगर समाजातील अनेक बुद्धीजीवी तरुण समाज-प्रबोधनाकडे वळत आहेत व धनगर समाजाला जागे करण्याचा मनस्वी प्रयत्नही करत आहेत. सदरचे समाज-प्रबोधन हि काळाची गरज आहे यात काहीच शंका नाही. परंतू समाज-प्रबोधन करीत असताना धनगर समाज-प्रबोधनापेक्षा इतर समाजाप्रती / धर्मांप्रती द्वेषभावना पसरवण्यातच काहींना जास्त रस असल्याचे त्यांच्या लिखानावरुन जाणवते किंवा स्पष्ट होते. त्याचीच प्रचीती म्हणून 'धनगर विरुद्ध मराठा', 'धनगर विरुद्ध ब्राह्मण' तसेच 'धनगर विरुद्ध आदिवासी' हे व असे अनेक विषय रोज सर्रास वाचण्यास मिळतात. 

धनगर समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचे सर्वच्या सर्व खापर ब्राह्मण समाजावर टाकून आपला धनगर समाज काळाच्या फार पाठीमागे राहिला, असे सांगत आमचे काही 'प्रबोधनकार' मित्र धन्यता मानतात. तर काही 'प्रबोधनकार' मित्र राजकीय मागासलेपणाचे सर्व खापर मराठा समाजावर टाकून विषयातून आपले हात पद्धतशीरपणे काढून घेतात. स्वतःच्या समाजाच्या चुकींवर पडदा टाकून त्या गोष्टींसाठी इतर समाजाला दोषी ठरवणे हे कितपत योग्य आहे ? याला समाज प्रबोधन म्हणावे का ?  

अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यास धनगर समाजास ब्राह्मणांनी रोखले होते का ? किंवा राजकारणात संघटीत होण्यासाठी धनगर समाजास मराठा समाजाने रोखले होते ? धनगर समाजाच्या मागासलेपणास अंशता इतर समाज कारणीभूत असतीलही, पण मुख्यत्वे ह्या सर्व गोष्टींसाठी धनगर समाजच स्वतः कारणीभूत आहे, हे एक कटूसत्य आहे. माझ्या मते कोणत्याही समाजाच्या अधोगतीला किंवा सामाजिक मागासलेपणाला इतर समाजापेक्षा / धर्मांपेक्षा स्वतः तो समाजच मुख्यत्वे कारणीभूत असतो. धनगर समाजाच्या बाबतीतही असेच काहीसे आहे.

माझ्या मते धनगर समाजाच्या आर्थिक, सामाजिक तसेच राजकीय मागासलेपणाची प्रमुख सहा कारणे आहेत, ती खालीलप्रमाणे; 
१. अशिक्षितपणा 
२. सामाजिक आणि राजकीय असंघटीतपणा 
३. अंधश्रद्धेवरील 'श्रद्धा' 
४. पारंपारिक व्यवसायामध्ये आधुनिकीकरणाचा अभाव 
५. सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीबाबतची उदासीनता 
६. स्वतःच्या गौरवशाली इतिहासाबाबतची उदासीनता

वरील प्रमुख सहा मुद्यांवर मात करुन धनगर समाज नक्कीच प्रगतीपथाकडे झेपावेल यात काहीच शंका नाही. हे सर्व प्रश्नं सोडविण्यासाठी धनगर समाजाने इतर समाजांवर आरोप न करता स्वपरीक्षण करून संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे, तर आणि तरच धनगर समाज स्वतःच्या गौरवशाली इतिहासाची पुनुरावृत्ती करु शकेल. या कार्यात समाजातील बुद्धीजीवी प्रबोधनकारांकडून सकारात्मक मदतीची अपेक्षा करतो आणि धनगर समाजाच्या पुढील 'संघटीत' वाटचालीस शुभेच्छा देतो.

आता, उदाहरणासाठी आपण ब्राह्मण समाजाचा विचार करु. भारतीय लोकसंख्येत जवळपास फक्त ३% असणारा ब्राह्मण समाज आज भारताचा प्रधानमंत्री बदलण्याचे सामर्थ्य ठेवतो याचे कारण काय असू शकेल ? कारण तो सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या संघटीत आहे, साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. सामाजिक प्रश्नांसाठी सर्व समाज एक होतो. तसेच त्या समाजातील बुद्धीजीवी लोकांकडून त्यांच्या संघटना अतिशय प्रभावीपणे चालवल्या जातात. 

तेच महाराष्ट्रात १७% लोकसंख्या असलेला धनगर समाज राज्यातून एक खासदार निवडून आणून देऊ शकत नाही, याचे कारण काय असू शकेल ? धनगरांचे अनेक प्रश्न इतकी वर्षे प्रलंबित का ? तसेच अनुसूचित जमातीमधील अंमलबजावणी असेल किंवा सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरणाचा मुद्दा असेल किंवा चराऊ कुरणांचा प्रलंबित मुद्दा असेल किंवा असे इतर अनेक… इतकी वर्षे सर्वच मुद्दे अनूत्तरित आहेत. याला कारणीभूत कोण ? धनगर समाजातील संघतीटपणा आणि सुशिक्षितपणा (नुसते शिक्षण नव्हे) यांचा अभाव ही ह्या मागील प्रमुख करणे असू शकतील, असे माझे वयक्तिक मत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकासाचे प्रमुख तीन मुद्दे सांगितले, ते असे - 'शिक्षण, संघर्ष आणि संघटन'. पण आपण त्यातील दोन मुद्दे (शिक्षण आणि संघटन) सोडून फक्त एका मुद्द्यानेच (संघर्ष) परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे यश मिळण्याची आशा तशी धुसर आहे. म्हणूनच धनगर समाजाने शिक्षण, संघर्ष आणि संघटन या तिन्ही मुद्द्यांसमवेत विकासाची ओढ धरावी. विजय नक्कीच आपला असेल.

धनगर समाजाच्या इतिहासाप्रती उदासीनतेवरही चर्चा होणे गरजेचे आहे. खऱ्या इतिहासाच्या नावाखाली ब्राह्मणद्वेष किंवा मराठाद्वेष पसरवण्याच्या घटनांची संपूर्ण महाराष्ट्राने याआधी दखल घेतलेलीच आहे. वाघ्या कुत्र्याचा मुद्दा असेल किंवा अहिल्यादेवींची तसेच तुकोजीराव होळकरांची बदनामी ही त्यातीलच काही निवडक उदाहरणे ! त्यामुळे खऱ्या इतिहासाच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या सामाजिकद्वेषाचा धनगर समाज बांधवांनी स्वतःच्या विवेक बुद्धीने विचार व पडताळणी करावी ही विनंती.

जय हिंद ! जय मल्हार !  

मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०१५ 

Wednesday, July 8, 2015

मराठी कविता - माणुसकी


मराठी कविता । माणुसकी । मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
Marathi Kavita । Manuski । Milind Dombale (Deshmukh)

Monday, June 8, 2015

बापू बिरू वाटेगावकर


मराठी कविता । बापू बिरू वाटेगावकर । मिलिंद डोंबाळे (देशमुख) 
Marathi Kavita । Bapu Biru Vategaonkar । Milind Dombale (Deshmukh)

Wednesday, November 12, 2014

Bapu Biru Vategaonkar (बापू बिरू वाटेगावकर)


युवकांनी व्यसनाच्या आहारी जावून अमूूूल्य जीवन बरबाद न करता स्वत:ची शरीर संपदा सांभाळून अन्यायाविरोधात विचाराच्या ताकदीने प्रतिकार केल्यास समाजातील दुष्टप्रवृत्तीचा नायनाट होईल.
- बापू बिरू वाटेगावकर (फलटण, दि.१३ जून २०११)